सुकमामध्ये स्फोटात पोलिस अधिकारी ठार   

दोन अधिकारी जखमी

सुकमा : छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यात सोमवारी नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीच्या स्फोटात एक अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) ठार झाला. तर, दोन पोलिस अधिकारी जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.अतिरिक्त पोलिस अधीक्षक (कोंटा विभाग) आकाश राव गिरीपुंजे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी दुःख व्यक्त केले. तसेच, नक्षलवाद्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला.
 
सीपीआय (एम) ने आज (मंगळवारी) ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर नक्षलवादी घटना टाळण्यासाठी गिरीपुंजे पायी गस्त घालत कंत्राटदाराच्या जेसीबी मशीनला आग लावल्याची माहिती समजली. त्यानंतर गिरीपुंजे आणि इतर अधिकारी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी गेले होते. या दरम्यान, नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेल्अया आयईडी स्फोटकांचा ते बळी ठरले, असे बस्तरचे पोलिस महासंचालक सुंदरराज पी.यांनी सांगितले.२०१३ च्या बॅचचे राज्य पोलिस सेवा अधिकारी गिरीपुंजे नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात शहीद झाले, असे गृहखात्याचीदेखील जबाबदारी सांभाळणारे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी सांगितले.
 
नक्षलवाद्यांनी हिंसाचार सोडून द्यावा आणि मुख्य प्रवाहात सामील व्हावे. तसेच, समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असेही ते म्हणाले.कोंटा-एराबोर रस्त्यावरील दोंड्रा गावाजवळ ही घटना घडली. नक्षलवाद्यांनी काही यंत्रांची तोडफोड केल्याची माहिती मिळाल्याने गिरीपुंजे यांच्या नेतृत्वाखालील पथक गस्तीवर होते. त्यावेळी, जमिनीखाली पेरुन ठेवलेल्या स्फोटक सामग्रीचा स्फोट झाला. यामध्ये एएसपी गिरीपुंजे, उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीओपी- कोंटा क्षेत्र) भानुप्रताप चंद्रकर आणि कोंटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सोनल ग्वाल जखमी झाले. या तिघांना तातडीने प्राथमिक उपचारांसाठी कोंटा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान गिरीपुंजे यांचा मृत्यू झाला, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
रायपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले गिरीपुंजे हे २०१३ मध्ये पोलिस उपअधीक्षक म्हणून भरती झाले होते. तर, मागील वर्षी ते कोंटा येथे एएसपी म्हणून नियुक्त झाले. गिरीपुंजे हे धाडसी अधिकार्‍यांपैकी एक होते. त्यांनी मानपूर-मोहला आणि सुकमा सारख्या नक्षलग्रस्त भागात सेवा बजावली होती, असे अधिकार्‍याने सांगितले.जखमी अधिकार्‍यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वृत्त असून त्यांना पुढील उपचारांसाठी रायपूर येथे विमानाने नेण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून नक्षलवाद्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलमुक्त करु, असे म्हटले आहे. 

Related Articles